दिवाळी पहाट-एक अविस्मरणीय आठवण !!



"उठा उठा दिवाळी आली ।।
मोती स्नानाची वेळ झाली ।।"

"खरचं ही जाहिरात ज्याने काढली आहे त्या पठयाला मानले पाहिजे..जेव्हा पण मी ही जाहिरात ऐकतो, बघतो तर बालपणीच्या आठवणीत रमून जातो..काय दिवस होते ते" शार्दूल म्हणाला.

"बाबा सांग ना तुझ्या लहानपणीची दिवाळीची आठवण.. तुमच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये अलार्म काका राहायचे का?सांग ना रे बाबा" मिथिल म्हणाला..

"अरे हो, सांगतो सांगतो..पण पाहिलं तू ब्रेकफास्ट करून घे. नाहीतर तुझी मम्मा आपला अलार्म वाजवेल. तुझं खाऊन झालं की, मग आपण निवांत बसून बोलू. आता काय वेळचवेळ आहे बोलायला" शार्दूल म्हणाला..

काही वेळानंतर,

शार्दूल आणि मिथिल बाल्कनीत बसले आणि मग शार्दूल बोलू लागला, "माझ्या लहानपणी आम्ही असे फ्लॅट मध्ये वगैरे राहत नव्हतो..तेव्हा आपण आता राहत असलेल्या बिल्डिंगच्या जागी एक चाळ होती..कॉमन गॅलरी हीच आमची बाल्कनी..आणि खाली मोठे अंगण..दिवाळीची सुट्टी पडली की, तासंतास आम्ही खालीच असायचो.  पव्या, दिलप्या, मोनू, सनी आमची तर टोळी होती. दिवाळीची आमच्याकडे जोरदार तयारी असायची..त्यावेळेला दिवाळीला घालायला नवीन कपडे मिळावेत म्हणून मी वर्षभर कपडे घेत नसे..अगदी वाढदिवसाला ही नाही..तेव्हा परिस्थिती पण बेताचीच होती म्हणा आणि घरात अण्णा, आई, मी, तुझी सुमी आणि निलू आत्या..एवढे सगळे राहायचो..मग जे काही मिळायचे त्यात समाधान मानावं लागायचं..

तेव्हा सगळ्यांमध्ये खूप कॉम्पिटीशन असायची..दिवाळीत कोणाचे कपडे सगळ्यात फॉर्म असतील म्हणून..

मला अजूनही आठवतंय. रात्रीपासूनचं खरी तयारी सुरू व्हायची माझी..माझे नवीन कपडे मी व्यवस्थित घडी करून टेबलावर ठेवत असेआणि पहाटे उडवायचे फटाके, अगरबत्ती आणि एक पणती ज्यामध्ये मी रात्रीच आईकडून तेल आणि वात घालून घेत असे.. 

रात्रभर तर मला झोप पण नसायची. कधी एकदाची पहाट होते असे व्हायचं.. मग पहाटे उठल्यावर आई सुंगधी उटण्याने अंघोळ 

घालत असे आणि मग उरलेली अंघोळ मी स्वतः करून फक्त टॉवेल घालून मी आमच्या दारासमोरच्या तुळशी वृंदावनासमोर उभा राहत असे..मग अण्णा खाली कारिट ठेवत असतं"

"बाबा, हे कारिट तेच ना जे खूप कडू असतं..तरी तू दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी माझ्याकडून फोडून घेतोस आणि मला चाखायला लावतोस" मिथिल म्हणाला..

"हो,तेच कारिट..हा मग पुढे ऐक.. मग जसा मी तुला चाखायला लावतो. तसेच अण्णा सुद्धा मला चाखायला लावत असतं.. कसलं कडू असायचं ते..मग आई हातावर लाडू ठेवत असे..त्यामुळे ती कडू चव उडन छू होत असे..

अण्णा सांगायचे, आपण नरकचुतुर्थी दिवशी अभ्यंगस्नान करतो..कधी नव्हे ते पहाटे उठतो..नवीन कपडे आणि फटाक्यांचे निमित्त का असेना पण आळस झटकून ताजेतवाने होतो..मग हे कारिट म्हणजे त्या राक्षसाचे प्रतीक आहे ज्याला आपण आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने ठेचून मारतो..जेणेकरून आपण आजच्या सारखे नेहमी उत्साही असू आणि त्याला चाखून आपण वाईट सवयींकडून चांगल्या सवयींकडे वळतो..
तेव्हा ते लेक्चर वाटायचे..पण आता समजतंय, अण्णा जे काही सांगायचे त्यामध्ये किती तथ्य होतं..

शार्दूल थोडा भावनिक होतो..पण मिथिलला कळू नये असा भाव चेहऱ्यावर आणून पुढे बोलू लागतो..

"तर आपण कुठे होतो, हा, तर मग मी नवीन कपडे घालून अण्णांचं अत्तर चोरून लावायचो आणि फटाके घेऊन अंगणात यायचो..
तेव्हा परफ्युम वगैरे फॅड नव्हतं..अत्तर हेच आमचा डियो आणि पेरफ्युम..
पण नेहमीप्रमाणे पव्या आधी अंगणात आलेला असायचा.. तो ग्राउंड फ्लोरला राहायचा ना..त्याला तो ऍडवानटेज असायचा. मग आम्ही सगळी बच्चेकंपनी भरपूर फटाके उडवायचो. त्यातले काही संध्याकाळी राखून ठेवायचो..मग समोर असलेल्या देवळात जाऊन पाया पडून यायचो..

मग स्वारी आपापल्या घरी निघायची..जोरात भूक लागलेली असायची. मग आई फराळाचे ताट करायची.. एव्हाना सगळ्यांची अंघोळ झालेली असायची..मग आम्ही सगळे मिळून फराळ खायचो..भरपूर गम्मत होती तेव्हा..
मग दुपारी आई कामे आटपून दारासमोर रांगोळी काढायला बसायची..मग आम्ही सगळे बच्चेकंपनी अख्खी बिल्डिंग फिरायचो आणि कोणाची रांगोळी बेस्ट ते आमचे आम्ही ठरवायचो..
सुलू आत्या आहे ना, अरे तुझ्या फ्रेंड निशांतची आत्या, ती काय रांगोळी काढायची..जबराट!!"

"बाबा तू तेव्हा मोती साबणाने अंघोळ करायचास का?" मिथिल म्हणाला..

"तेव्हा मोती साबण सगळ्यात रॉयल होता..त्या साबणाने वर्षातून एकदाच म्हणजे दिवाळीला अंघोळ करायला मिळायची.. 
त्याचा तो चंदनाचा वास आहा!!आहा! अजून माझ्या नाकात घुमतोय..नाहीतर बाकीच्या दिवशी लाइफबॉय आहेच..
त्यावेळी ना मिथिल कोणाच्याही घरी कधीही जा..फराळ मिळायचा आणि तो पण पोट भरेपर्यंत..आपल्या बाजूचा अवि काका आहे ना त्याची आई काय चिवडा बनवायची..मी तिचा ठरलेला मेंबर असायचो..पण दिवाळीच्या या ३-४ दिवसात कधीही त्याच्या घरी जा..काकू बशीभर चिवडा पुढे करायचीच..आणि मी पण तो फस्त केल्याशिवाय त्यांच्या घरातून बाहेर काही पडायचो नाही..तसंच अव्याला आईच्या हातचे रव्याचे लाडू आवडायचे.."

"अरे,ती दिवाळी म्हणजे माझ्या मते खरी दिवाळी होती..नाहीतर आता..क्वचितच कोणी घरी फराळ करतो. फटाके उडवले की वायू, ध्वनी प्रदूषण होते..मला सगळं पटतं.. आता ऑफिसच्या कामामुळे प्रत्येकाला फराळ करणं शक्य नाही..पण फटाक्यांशिवाय दिवाळी..राज नही आती यार..

माझे म्हणणे आहे की, सुतळी बॉम्ब, लवंग्या वर बंदी आणा ना..ते फटाके जास्त आवाज करतात..पण पाऊस, भुईचक्र तर लावू देत मुलांना..हे आपले माझे विचार आहेत..शेवटी जनरेशन गॅप हा आपल्यात असणारचं..
सो, मिथिलराव ही तर माझी दिवाळी होती..पण तू तुझी दिवाळी तुझ्या जनरेशन नुसार अविस्मरणीय कर.."

माझी दिवाळी पहाट अशी होती..तुझी अजून वेगळी असेल..

~समाप्त~

(ही कथा आवडल्यास ती आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा..धन्यवाद)
@preetisawantdalvi










 

4 comments:

  1. छान लिहिलंय!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ज्योतीजी😊

      Delete
  2. मस्तं जुने दिवस आणि आठवणी ताज्या झाल्या

    ReplyDelete
  3. exellent work , very very nice story , keep it up

    ReplyDelete